लोकसभा निवडणूक 2019: दुसरा टप्पा - महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी 57% मतदान

सोलापूरमध्ये मतदार महिला
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच मतदारंसघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं आहे.
संध्याकाळी पाच वाजता मतदान बंद झालं तोपर्यंत दहा मतदारसंघामध्ये सरासरी 57.22 टक्के मतदान झालं आहे.
नांदेडमध्ये सर्वांत जास्त 60.88टक्के, त्यानंतर हिंगोलीमध्ये 60.69 टक्के, परभणीत 58.50 टक्के, लातूर 57.94 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, बुलढाणा 57.09 टक्के, अमरावती येथे 55.43 टक्के, अकोला येथे 54.45 आणि सोलापूर येथे 51.98 टक्के मतदान झालं आहे.
याबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीच्या नवनीत राणा, बीडमधले राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि भाजपच्या प्रीतम मुंडे, अशा मोठ्या नेत्यांचं नशीब मतदानयंत्रात कैद झालं आहे.
पाहा दिवसभरात काय काय घडलं -
प्रकाश आंबेडकर यांचा EVM वरून आरोप
''महाराष्ट्रात जिथं मतदान सुरू आहे. त्यातील अनेक ठिकाणी मतदानयंत्रं नीट काम करत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन जिथे जिथे मतदान यंत्रात बिघाड झालाय, तिथे मतदानाची वेळ वाढवावी'' अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
ईव्हीएमवर कोणतंही बटन दाबलं तरी ते मत भाजपलाच जात होतं. असं दोन मशीन्समध्ये झालं. हे मशीन सील करण्यात आलं आहे, असं आंबेडकरांनी सांगितलं.
किमान सोळा मशीन नीट काम करत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या, असं आंबेडकरांनी सांगितलं.
प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार झालेला नाही. अशी कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही. एका चिन्हावर बटण दाबल्यावर कमळाला मतदान जात होतं ही सर्वथा चुकीची बाब आहे. ही दिशाभूल करणारी बाब आहे. मी निवडणूक अधिकारी म्हणून स्वतः खात्री केली आहे पण त्यात असा प्रकार आढळून आला नाही, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकरांचं मतदान अकोल्यात आहे पण अद्याप ते सोलापूरमध्येच तळ ठोकून आहेत. त्यांनी अद्याप मतदान केलं नाही.
दरम्यान सोलापुरात पहिल्या दोन तासात 5 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
चकमकीत दोन नक्षलवादी ठार
भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेला नक्षलवादी ए. सी. एम. वर्गिज आणि आणखी एक नक्षलवादी ठार झाला असल्याचं दांतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितलं. हे दोन नक्षलवादी मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डसोबत धनिकार्का येथे झालेल्या चकमकीत दोन जण ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेमा मालिनी म्हणतात मोदींची 'हवा'
मथुरा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार हेमा मालिनी सांगतात की मोदींची हवा आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या मोदींनी इतकं काम केलं आहे की सगळे लोक प्रभावित आहेत.
त्यांच्या भीतीनेच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले. इतके दिवस ते एकमेकांचे शत्रू म्हणून वागले पण पंतप्रधान मोदींमुळे ते एकत्र आले. देशात फक्त मोदींची हवा आहे इतर कोणत्याच पक्षाची नाही असं हेमा मालिनी म्हणाल्या.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी मतदान केलं.
दरम्यान आज सकाळी सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री आणि सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वला शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यासुद्धा उपस्थित होत्या.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आपण अनेकदा तिरंगी आणि चौरंगी लढती पाहिल्या आहेत. इथं जात, धर्मावरून भेद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यात विरोधकांना यश येणरा नाही, असं म्हटलं.
तर साध्वी प्रज्ञासिंग यांना उमेदवार देऊन कडवं हिंदुत्व पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचंही शिंदे म्हणाले.
अमरावती लोकसभा मतदारसंघातही मतदानाचा उत्साह दिसून येतो आहे. आधी लग्न लोकशाहीचं मग स्वत:चं असा बाणा दाखवत दिनेश शेळके या युवकानं बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावात दिनेश यांनी मतदान केलं.
तिकडे अमरावती लोकसभा मतदारसंघात युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार आणि आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांनी पतीसह मतदानाचा हक्क बजावला.
त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यांच्याविरोधात सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या आनंदराव अडसूळ यांचं आव्हान आहे. गेल्या निवडणुकीतही नवनीत राणा यांनी अमरावतीतून नशीब आजमावलं होतं. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
आज मतदानाचा दुसरा टप्पा आहे. महाराष्ट्रात 10 जागांवर आज मतदान होत आहे. अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, प्रीतम मुंडे या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
11 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं.
आज बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी मतदान होत आहे. सुशील कुमार शिंदे हे सकाळीच मतदान केंद्रावर हजर झाले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रासह देशात 95 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बुधवारी आसाम (5), बिहार (5), छत्तीसगढ (3), जम्मू काश्मीर (2), कर्नाटक (14), मणिपूर (1), ओडिशा (5), पुद्दुचेरी (1), त्रिपुरा (1), उत्तर प्रदेश (8), पश्चिम बंगाल(3) यांच्यासह तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39 जागांसाठी मतदान होत आहे.
फोटो स्रोत, BBC NEWS
पद्म पुरस्कारविजेत्या 99 वर्षांच्या नानाम्लल आजींनी कोईम्बतूर येथे मतदान केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)