प्रचार एक दिवस आधीच संपवण्याच्या मुदद्यावरून ममता बॅनर्जी भडकल्या

पश्चिम बंगालमध्ये वेळेआधीच प्रचार संपवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. अमित शहा यांच्या रॅलीत झालेली हिंसा लक्षात घेता निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
"अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे हिंसाचार झाला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा मोडला. मोदींना त्याबदद्ल अजिबात पश्चात्ताप झाला नाही. पश्चिम बंगालच्या लोकांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अमित शहा यांच्यावर कारवाई करायला हवी," असं त्यांनी म्हटलं आहे.
"मी मोदींविरुद्ध बोलतेय म्हणून पश्चिम बंगालला लक्ष्य केलं जात आहे. निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणाखाली काम करत आहे. हा अयोग्य निर्णय आहे. कालचा हिंसाचार अमित शहांमुळे झाला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस का बजावली नाही? किंवा त्यांना का बडतर्फ केलं नाही," असा सवाल त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाचा नेमका निर्णय काय?
पश्चिम बंगालमधल्या 9 मतदारसंघामध्ये गुरुवारी रात्री 10 वाजता प्रचार संपणार आहे. जो आधी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता संपणार होता.
शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये 9 जागांवर मतदान होणार आहे.
गुरुवारी रात्री 10 वाजता पश्चिम बंगालमधील नऊ जागांसाठीचा प्रचार संपणार आहेत. डमडम, बरासत, बसिरहट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर दक्षिण आणि उत्तर कोलकाता या नऊ जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.
19 मे ला लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. सामान्य परिस्थितीत प्रचार 17 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणं अपेक्षित होतं. मात्र निवडणूक आयोगाने एक दिवस आधीच प्रचार संपवण्याचा आदेश दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या मते कलम 324 चा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाने कोलकातामध्ये झालेला हिंसाचार आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती तोडण्याची घटना दु:खद आहे आणि सरकार दोषींना लवकरच अटक करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे एडीजी (सीआयडी) राजीव कुमार आणि प्रधान सचिव (गृह) अत्री भट्टाचार्य यांना पदावरून हटवलं आहे.
राजीव कुमार यांना निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या गृह मंत्रालयात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांना उद्याच म्हणजे गुरुवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
- ईश्वरचंद्र विद्यासागर कोण आहेत, ज्यांच्या नावावरून सध्या राजकारण सुरू आहे
- 'CRPF नसते तर मी वाचलो नसतो' - अमित शहांचा ममता सरकारवर हल्ला
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)