शेतकरी आंदोलन : शेती कायदे दीड वर्ष स्थगित करण्यासाठी सरकार तयार

शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

नरेंद्र मोदी सरकारच्या नवीन शेती कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

बुधवारी (20 जानेवारी) केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची 10वी फेरी पार पडली.

यादरम्यान केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला आहे.

त्यानुसार केंद्र सरकारनं नवीन शेती कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.

शेतकरी नेत्यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी सांगितलं, "तीन शेती कायदे आणि हमीभावाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. तिन्ही कायद्यांविषयीचं प्रतिज्ञापत्रं सर्वोच्च न्यायालयात सादर करू आणि कायद्यांना एक ते दीड वर्षासाठी स्थगित करू, असं सरकारनं म्हटलं आहे.

"याशिवाय एक समिती या कायद्यांचं आणि हमीभावाचं भविष्य ठरवेल. या प्रस्तावावर विचार करू, असं आम्ही सरकारला सांगितलं आहे."

शेती कायद्यांच्या अभ्यासासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक समिती गठीत केली आहे.

या समितीसमोर उपस्थित राहण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.

यासाठी सरकारी प्रतिनिधी आणि शेतकरी नेते यांची एक संयुक्त समिती बनवण्याचा नवा प्रस्ताव सरकारनं दिला आहे.

दीड वर्षं ही समिती शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेईल आणि त्यावर आधारित एक अहवाल तयार करेल.

22 जानेवारीला पुढची बैठक

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पुढची चर्चा 22 जानेवारीला होणार आहे.

22 जानेवारीला या समस्येवर तोडगा निघेल, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे.

"1 ते दीड वर्षं शेती कायदे स्थगित करण्यासाठी सरकार तयार असल्याचं आम्ही चर्चेच्या वेळी सांगितलं आहे. शेतकरी नेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आता ते याविषयी चर्चा करून 22 जानेवारीला त्यांचा निर्णय कळवणार आहेत," असं तोमर यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांनीही सरकारचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारलेला नाहीये. गुरुवारी (21 जानेवारी) या प्रस्तावावर चर्चा करू, असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे.

जम्हूरी किसान सभेचे सरचिटणीस कुलवंत सिंग संधू बुधवारच्या चर्चेत सहभागी होते.

त्यांनी सांगितलं की, "18 ते 24 महिने शेती कायदे स्थगित करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी प्रस्ताव दिला आहे. तसंच यासंबंधीचं प्रतिज्ञापत्रंही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं जाणार आहे."

या कायद्यांमध्ये कोणत्या तरतुदी आहेत आणि शेतकऱ्यांचा आक्षेप कशाला आहे?

केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेश आणले होते ज्यांचं रुपांतर आता कायद्यात करण्यात आलं आहे. या कायद्यामधील काय तरतुदी आहेत आणि त्यावर काय आक्षेप घेतले जातायत, ते आधी पाहूया.

पहिला कायदा- शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020

हा कायदा कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतो. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत -

  • कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री
  • कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे
  • मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे
  • इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे

शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण याबद्दल काही आक्षेपही आहेत.

विरोधकांचे आक्षेप काय आहेत?

  • APMC बाहेर विक्री झाल्यास 'बाजार शुल्क' न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल.
  • बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते यांचं काय होणार?
  • किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल
  • e-NAM सारख्या ई-ट्रेडिंग यंत्रणा बाजारांवर अवलंबून असतात. बाजारच नामशेष झाले तर त्या कशा चालतील?

फोटो स्रोत, Getty Images

दुसरा कायदा - शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020

हा कायदा कंत्राटी शेतीबद्दल बोलतो. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

  • आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल
  • 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल
  • बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील
  • मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात

शेती क्षेत्राचं उदारीकरण?

शेती क्षेत्राचं उदारीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असंही म्हटलं जातंय. पण यात खरंच शेतकरी फायदा करून घेऊ शकतील का ही शंका उपस्थित केली जातेय.

  • कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का?
  • अनेक लहान-लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का?

फोटो स्रोत, VILAS TOLSANKAR

तिसरा कायदा - अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020

Essential Commodities (Amendment) Bill म्हणजे अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हा तिसरा आहे, ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. याच्या तरतुदी काय आहेत?

डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. अपवाद: युद्धसदृश असामान्य परिस्थिती

  • निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल
  • किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा

या तरतूदींमुळे शेतकऱ्यांचं नुकसानच होईल असाच आरोप केला जातोय. नेमके काय आक्षेप आहेत ते आपण पाहूया :

  • मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील.
  • शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती
  • कांदा निर्यातबंदी सारख्या निर्णयांमुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दल साशंकता

केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी हिंदुस्तान टाईम्समध्ये लिहिलेल्या एका लेखात या विधेयकांचं समर्थन करताना म्हटलंय, "अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून निर्मला सीतारमण यांनी शेती क्षेत्रात लायसन्स परमिट राज आणि इन्सपेक्टर राज संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकलंय.

2019-20 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसून येतं की ECA मुळे साखर, कांदा आणि डाळींच्या किंमती वाढायच्या आणि साठेबाजांवर धाडी टाकण्यात फक्त व्यापारांचं शोषण व्हायचं."

किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कृषीमाल वगळण्याचं आम्ही स्वागत करतो पण त्याबरोबरच सीलिंग कायदाही रद्द झाला पाहिजे. 1960 पूर्वी बाजार समित्यांशिवायच व्यवहार व्हायचे. आता पुन्हा शेतकऱ्यांना तसा पर्याय उपलब्ध होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)